आज (३० डिसेंबर) मंगेश पाडगावकरांचा स्मृतिदिन! २ वर्षांपुर्वी पाडगावकर आजोबा आपल्याला सोडून गेले. पण प्रत्यक्ष जरी भेटले नसले तरी लहानपणापासुन ज्या कवींच्या कितीतरी कविता तोंडपाठ होत्या त्यातले हे एक आजोबा! ‘सुट्टी एके सुट्टी’, ‘ नाटक फसते त्याची कविता’, ‘वेडं कोकरु’, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ या बाल-कविता आजही तोंडपाठ आहेत! ‘शब्दावाचुन कळले सारे’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘जेव्हा तुझ्या बटांना’, ‘जेव्हा तिची नि माझी’ सारखी कितीतरी गाणी सतत ऐकली जातात. ‘बोलगाणी’, ‘सलाम’, ‘सांगा कसं जगायचं’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ सारख्या कित्येक कविता तोंडपाठ आहेत.
गेल्या वर्षी याच सुमारास मी हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉगला नाव काय द्यावं या विचारात असताना मला एकदम ‘आनंदयात्री, मी आनंदयात्री’ ही -मी पाडगावकरांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमांत ऐकलेली- कविता आठवली. ही माझी अत्यंत लाडकी कविता! अडचणी-दुःखाच्या काळातही आशा जागृत ठेवणारी, निगेटिव्ह गोष्टींमध्येही आपल्याला-‘आपल्या भोवतीचा निसर्ग- हे जग, सुंदर आहे, आयुष्यात खुप आनंद भरलेला आहे’-याची आठवण करुन देणारी ही कविता! पाडगावकरांच्या कविता वाचल्या की ते किती आशावादी कवी होते हे जाणवतं. त्यांच्या या कवितेतला ‘आनंदयात्री’ हा शब्द मला इतका आवडला होता! पुलं आणि सुनीताबाईंनी केलेल्या बोरकरांच्या कविता-वाचनाच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग मी ऐकलं तेव्हा हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता. (बोरकर हेही एक आनंदयात्री कवीच! पाडगावकरांवर त्यांचेही संस्कार होतेच!) आयुष्याला ‘आनंदयात्रा’ म्हणणं हे किती छान आहे! त्या शब्दातुनच इतकी सकारात्मकता पसरते! ‘कितीही दुःखं-अडचणी असल्या, आजुबाजुला अगदी काळोख असला तरीसुद्धा प्रकाशाचं गाणं गात जाणारा मी एक आनंदयात्रीच आहे!’ – आज आजुबाजुला घडणाऱ्या वाईट घटनांमध्ये, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अशी जाणीव करुन देणारं काहीतरी असावं नेहेमी!
माझा ब्लॉग सुरु केला तेव्हा माझ्या मनात येणारे विचार ऑर्गनाइज्ड आणि एकत्र एका ठिकाणी रहावेत हा एकच हेतु होता. मी फार छान-उत्तम वगैरे लिहीत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण लिहून व्यक्त व्हायला मला लहानपणापासुनच फार आवडतं. म्हणुनच माझी स्वतःची एक स्पेस असावी म्हणुन हा ‘ब्लॉग’! ब्लॉगवरचे माझे अनुभव, विचार वाचणाऱ्याला मी फार वेगळं काही देऊ शकेन की नाही हे मी सांगु शकत नाही. पण मनस्ताप, वैचारिक गोंधळ, दुःख होईल असे काही लिहायचं नाही- जमल्यास थोडासा आनंद, प्रकाशाचा कवडसा देण्याचाच प्रयत्न करायचा-हा एक उद्देश होता. त्या निमित्ताने मीही आजुबाजुच्या चांगल्या गोष्टी पाहु लागेन, आनंद देणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व देईन हाही एक हेतु आहे या मागचा! म्हणूनच हे सगळं लक्षात घेता, माझ्या ब्लॉगचं नाव मी या कवितेची ओळच असेल हे निश्चित केलं!
आज पाडगावकरांच्या स्मृती-दिनानिमित्त ही कविता पोस्ट करत आहे!
खूप छान लिहिले आहेस. पाडगावकरांनाही हे वाचून आनंद वाटला असता. असेच लिहीत रहा. आनंदात रहा.
आशीर्वाद व शुभेच्छा
कडेपूरकर आजोबा व आजी
LikeLike
Thank You Harshu Kaka! 😀 😀 🙂
LikeLike
तुझ्या प्रवासाची तु आनंदयात्री हो!!!!
आई, बाबा आणि संयुक्ता…..
LikeLike
😀 😀
LikeLike